पिंपरी, पुणे (दि. २३ जुलै २०२६) : पर्यावरण संरक्षणाला चालना देण्याच्या उद्देशाने पृथ्वी सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंती निमित्त “प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक” हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे याचे सर्व नागरिकांनी अनुकरण करून शहर स्वच्छतेमध्ये योगदान द्यावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष ज्येष्ठ नेते योगेश बहल यांनी केले. आपले शहर प्लास्टिकमुक्त, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक असावे यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे योगेश बहल यांनी सांगितले. दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उपक्रमाचे उद्घाटन बुधवारी पिंपरी येथे करण्यात आले.
यावेळी पक्ष प्रवक्ते अजित गव्हाणे, मा. विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, ज्येष्ठ नगरसेविका डॉ. वैशाली घोडेकर, वैशाली काळभोर, जितेंद्र ननावरे, संगीता ताम्हाणे, वर्षा जगताप, सारिका मासुळकर, राजू बनसोडे, विराज लांडे, पंकज भालेकर, उज्वलाताई ढोरे, निकिता कदम, माजी नगरसेवक पंडित गवळी, सीमाताई सावळे, फजल शेख, आशा शेडगे, राजेंद्र जगताप, प्रकाश सोमवंशी, शेखर काटे, सारंग कामतेकर, दीपक साकोरे, च्रंद्राम हलगी, जव्हार इटकल, संपद पांचुदकर, शक्रुल्ला पठाण, रमजान सय्यद, मनीषा गटकळ,डॅनियल दळवी, कविता खराडे, प्रविण पिंजन, बाबा चौधरी तसेच विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, सदस्य आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आयोजक व पृथ्वी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष रशीद सय्यद यांनी सांगितले की, प्लास्टिक प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या समस्यांबाबत प्रत्येक नागरिकाने जागरूक राहिले पाहिजे. आपण वापरलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या रस्त्यावर, नाल्यात किंवा सार्वजनिक ठिकाणी न टाकता “प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक” मध्ये जमा केल्या पाहिजेत. यामुळे प्लास्टिक कचऱ्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन, पुनर्वापर करता येईल आणि पर्यावरण संवर्धनाला निश्चितच चालना मिळेल.
यावेळी पृथ्वी सोशल फाउंडेशनचे सचिव व कार्यक्रमाचे समन्वयक रविंद्र ओव्हाळ यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड शहराच्या आधुनिक विकासाचा पाया दिवंगत उप मुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रचला आहे. त्यांच्या दूरदृष्टीमुळे आणि धाडसी निर्णयामुळे महामार्गांचे रुंदीकरण झाले. स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी हा नावलौकिक अजितदादा पवार यांच्या मुळे प्राप्त झाला आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने देशात स्वच्छतेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले होते. स्वच्छता आणि पर्यावरण रक्षण यामध्ये आपले शहर कायम प्रथम राहवे यासाठी आणि अजितदादा पवार यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. आगामी काळात शहरातील विविध शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालये, व्यावसायिक संकुले आणि सार्वजनिक ठिकाणी अधिकाधिक ‘प्लास्टिक बॉटल कलेक्शन बँक’ उभारून नागरिकांमध्ये पर्यावरणाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे असे रवींद्र ओव्हाळ यांनी सांगितले.
स्वागत रवींद्र ओव्हाळ, सूत्रसंचालन अविनाश शिंदे आणि आभार विनोद वरखडे यांनी मानले.













