
प्रातिनिधि : वडमुखवाडी, चऱ्होलीतील पाणी प्रश्नावर नागरिक आक्रमक झाल्याचे सोमवारी पाहायला मिळाले. स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली हंडा मोर्चा काढून नागरिकांनी आपला संताप व्यक्त केला. “नागरिकांच्या संयमाचा बांध आता फुटला असून धरण भरलेले असताना नागरिकांना चार ते पाच दिवस पाणी मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. गेल्या दहा वर्षातील नियोजनशून्य आणि भ्रष्टाचारी कारभारामुळे “पाणीबाणी”ची परिस्थिती उद्भवली असल्याची घणाघाती टीका गव्हाणे यांनी केली. येथील पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत चऱ्होली परिसरात महापालिकेने टँकरने मोफत पाणीपुरवठा करावा अशी आग्रही मागणी गव्हाणे यांनी केली आहे.
अजित गव्हाणे म्हणाले, पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वात वेगाने विकसित झालेला भाग तसेच पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला दुवा साधणारा मध्यवर्ती बिंदू असल्यामुळे चऱ्होली, वडमुखवाडी आणि डुडुळगाव या भागामध्ये प्रचंड लोकवस्ती वाढली आहे. मोठे गृहप्रकल्प झाले आहेत. त्यामुळे हा भाग रेसिडेन्शिअल हब म्हणून ओळखला जात आहे. मात्र या भागाला पाण्यासाठी ओरड करावी लागते, ही मोठी शोकांतिका आहे. येथील अनेक सोसायट्यांमध्ये चार ते पाच दिवस पाणी येत नाही. टँकरने पाणी घ्यावे लागते. वारंवार नागरिक, सोसायटी धारक तक्रारी करत असूनही कोणी लक्ष देत नाही. पाण्याच्या तक्रारी करणाऱ्या नागरिकांना अधिकारी दुरुस्तर करतात. वाटेल तसे बोलतात. त्यामुळे नागरिक तसेच सोसायटीधारकांचा संयमाचा बांध फुटला आहे. अनेकांनी माझ्याकडे तक्रारी केल्यामुळे हा हंडा मोर्चा काढून भाजप आमदारांच्या भ्रष्ट कारभाराचा निषेध व्यक्त केला आहे.


















